We will fetch book names as per the search key...
‘बालपणी पावसात भिजताना बेभान व्हायचो आणि जाणवलं,बालपणानंतर आपण पावसापासून स्वतःचा बचावच करत आलो’ अज्ञात कथेतील मृत्यूसमीप झालेली ही जाणीव; ‘घायाळ करणाऱ्या घटनांना फक्त आंतरिक स्थिरतेची जोड दिली की त्या जखमा विरून जातात हे तुला कळू लागले होते, पण तीच एक एक जखम आपल्या हातून अलौकिक कला घडवतेय, म्हणून तू त्या जखमेचेच शब्द केलेस.’ ईश्वर आणि चार आत्मे यामधील ईश्वराचे संवाद;‘आत्महत्येची नव्हे,हत्येची गोष्ट’कथेतून आजच्या तरुणांमधील वाढत असलेले नैराश्य, अशा सर्वच कथा वाचताना आपल्याला समृद्ध करतात! सत्य दाबून ठेवणे आणि असत्य जगणे, यातून खरे दुःख निर्माण होते. दुसऱ्यासाठी त्याग करू नये,जर तो त्याग दुसऱ्याला काही काळासाठी आनंद देईल पण आपल्याला मात्र जन्मभर सल देईल,जणू हाच आशय ‘मायेचा स्पर्श’ या कथेतून प्रकट होतो.अगदी मनापासून लिहिलेल्या, सत्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या, प्रश्नांतून मार्ग शोधू पाहणाऱ्या या सर्व कथा आपल्याला नक्की आवडतील, खात्री वाटते.
राहुलच्या कथा गेल्या काही वर्षात लोकप्रभा, माहेर, उत्तमकथा अशा दर्जेदार मासिकांत / साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या आहेत. या कथासंग्रहातल्या अज्ञात या कथेवर एकपात्री सादरीकरणाला ‘स्वस्तिक’ राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक (१०,०००/- आणि स्मृतिचिन्ह), याच कथेच्या (अज्ञात) एकपात्री सादरीकरणाला ‘अंतरंग थिएटर्स’ ऑनलाईन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच या कथासंग्रहातल्या ‘जीवन त्यांना कळले हो ..’ या कथेला स्टोरीमिरर आयोजित स्पर्धेत रोख पारितोषिक मिळाले आहे.